पिंपरी चिंचवड

`राजकारण सोडेन, पण शेकाप सोडणार नाही' म्हणणारे जगताप भाजपला कळलेलेच नाहीत : संजोग वाघेरे-पाटील

उत्तम कुटे

पिंपरीः राजकारण सोडेन,पण शेकाप सोडणार नाही, अशा प्रतिज्ञा गत लोकसभेला (2014) केलेले लक्ष्मण जगताप हे भाजपला अद्याप कळलेलेच नाही. पण ते लवकरच कळतील, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी आज केला. तसेच लोकसभेला मावळसाठी पक्षाकडे अनेक सक्षम उमेदवार असल्याने आम्हाला उमेदवार आयात करायची गरज नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्य मंत्रीमंडळाच्या आगामी विस्तारात मंत्रीपद मिळाले नाही वा लोकसभेला युती झाली,तर जगताप हे राष्ट्रवादीत येऊन लोकसभा लढतील,अशा बातम्या गेल्या काही दिवसांत प्रसिद्धीमाध्यमांत आल्या आहेत. त्यावर सरकारनामाला प्रतिक्रिया देताना वाघेरे यांनी वरील हल्लाबोल केला. पक्षाने त्यांना सगळं देऊनही त्यांनी पक्षाला त्रासच दिला, असेही ते म्हणाले. वाघेरे हे मावळमधून लोकसभेसाठी इच्छूक आहेत. तशी तयारीही त्यांनी सुरु केली आहे. तर, त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी हा युती झाली,तर युतीचा उमेदवार म्हणजे शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे असणार आहेत. मात्र, युती झाली नाही,तर जगतापही त्यांचे स्पर्धक असू शकतात.

वाघेरे म्हणाले, की राष्ट्रवादीत असलेले जगताप हे मे 2014 च्या लोकसभा निवडणुकीला शेकापमध्ये गेले. त्यावेळी त्यांनी राजकारण सोडेन,पण शेकाप सोडणार नाही, अशी भीष्मप्रतिमा केली होती. मात्र, नंतर चार महिन्यांनीच झालेल्या विधानसभा निवडणुकीला ते भाजपमध्ये गेले. आमदार झाले. शहराध्यक्षही झाले. आता मंत्रीपदासारखे मोठे पद मिळविण्यासाठी त्यांचेच हे दबावतंत्र (मंत्रीपद द्या नाही, तर  राष्ट्रवादीत जातो) असण्याची शक्यता आहे. मंत्रीपद पदरात पाडून घेण्यासाठी त्यांचीच ही चाल असावी, असे त्यांच्याबरोबरच्या वीस वर्षाच्या अनुभवातून वाटते आहे. त्यांना पक्षात घ्यायचे असते, तर यापूर्वीच घेतले असते. आता भाजपचाच तसा उलटा कांगावा सुरु असून त्याचे बील ते आमच्यावर फाडत आहेत. 

राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष आणि एकेकाळचे जगताप यांचे कट्टर समर्थक प्रशांत शितोळे हे सुद्धा आपल्या अध्यक्षांच्या मतांशी सहमत दिसले. उलट त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार आक्रमक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मोठ्या पदाच्या इर्षेने जगताप हे भाजपला ब्लॅकमेल करीत असल्याचा संशय आहे. त्यामागे त्यांचा राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा कुटील डावही आहे. तसेच उमेदवारीचा निर्णय घ्यायला आमचे नेते खंबीर आहेत. आम्हाला जगताप व त्यांच्या उमेदवारीची गरज नाही. ते खेळीया असल्याचे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे त्यांची ही चाल तथा खेळी असू शकते. कारण भाजपची ती रणनितीच आहे. चर्चा एक करायची आणि करायचे वेगळेच. ज्या रितीने ते आम्हाला सोडून गेले, त्याची फळे राष्ट्रवादी आजही भोगतो आहे. ती वेळ येऊ नये, यासाठी भाजपने आता सावध राहावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT